परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सोयीसाठी ठाकरे सरकार पुढे, त्यासाठी ‘इथे’ भरायचा ऑनलाईन फॉर्म
महाराष्ट्रासह देशभरामध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता आता देशात लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे संचारबंदीचे नियम लागू असणारचं आहेत. याकाळात वाहतुक व्यवस्था ठप्प असल्याने देशात आणि परदेशात अडकलेल्या अनेक नागरिकांना पुन्हा आपलं घर कसं गाठावं हा प्रश्न पडला आहे. मात्र आता हळुहळु राज्यात अडकलेले मजुर, पर्यटक, विद्यार्थी यांना घरी सुखरूप पोहचवण्यासाठी रेल्वे, बसची सोय करण्यात येत आहे. तसेच आता परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सोयीसाठीदेखील सरकार पुढे आले आहे.
प्रवासी विमानसेवा थांबवण्यात आल्याने आता अनेकांचा मायदेशी परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. पण महाराष्ट्र सरकारने आता परदेशात अडकलेल्या महराष्ट्रीयन लोकांना दिलासा दिला आहे. एका ऑनलाईन फॉर्ममध्ये परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना आपली माहिती भरून द्यायची आहे. ही माहिती महाराष्ट्राकडून केंद्र सरकारला दिली जाणार आहे. त्यानुसार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान 7 मे पासून केंद्र सरकार परदेशात अडकलेल्यांसाठी विशेष विमानसेवा देखील सुरू करणार आहे.
ठाकरे सरकारच्या ट्वीटर हॅन्डलवरून हा फॉर्म शेअर करण्यात आला आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती ते व्हिसा डिटेल्स देणंं गरजेचे आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या संबंधित विभागाला देऊन निर्बंध शिथील झाल्यानंतर सुटकेसाठी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी वापरली जाणार आहे.
7 मे पासून आबुधाबी ते कोच्ची आणि दुबई ते काझीकोडे अशी खास विमानसेवा दक्षिण भारतामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी झेपावणार आहेत. टप्प्या टप्प्याने परदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी ही विमानसेवा असेल. दरम्यान यामध्ये अमेरिका, ब्रिटन, मलेशिया, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करणार आहे. परदेशात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकायला जातात. सद्यस्थिती पाहता अनेकांना आपल्या मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. त्यांच्यासाठी आता सरकार प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांसोबत तात्पपुरते कामासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात गेलेल्या भारतीयांची संंख्यादेखील मोठी आहे. त्यांना आता हा मोठा दिलासा असेल.