परतीच्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता ;पुणे शहर आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा
परतीच्या पावसाचा फटका पुढच्या तीन दिवसात पुणे जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारीही केला आहे.
हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिले आहेत. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके; तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.