पत्नीला सोडून गेलेल्या 30 हजार अनिवासी भारतीयांना परत आणणार
नवी दिल्ली- विवाह केल्यानंतर आपल्या पत्नीला भारतातच सोडून गेलेल्या अनिवासी भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी पंजाब सरकारचा अनिवासी भारतीय विभाग प्रक्रिया सुरू करणार आहे. विवाह करून पत्नी भारतातच सोडून जाणाऱ्या अनिवासी भारतीयांना ‘हनीमून बर्डी’ असे म्हटले जाते. पंजाब सरकारच्या अनिवासी भारतीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतात पत्नी सोडून गेलेल्या अनिवासी भारतीयांची संख्या सुमारे 30 हजार आहे. डीएसजीपीसी (दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटी) चे अध्यक्ष मनजीत सिंग जीके आणि महासचिव मनजिंदर सिंग सिरसा यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे. विवाह विधी करण्यापूर्वी अनिवासी भारतीय पतींची संपूर्ण माहिती घेण्यासाठी ग्यानी गुरुबचन जत्थेदार श्री अकाली तख्त यांना पत्र लिहून विनंती केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही पत्रे पाठवली आहेत.
ज्यांचे पती विवाहानंतर परदेशात पळून गेले आहेत अशा महिलांना हनीमून ब्राईड असे म्हटले जाते. अशा महिलांपैकी एक सतविंदर कौर हिला मात्र हे पसंत नाही. असे म्हणणे महिलांसाठी अवमानकारक असल्याने असे शब्द वापरू नयेत असे त्या निक्षून सांगतात. अशा प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी डीएसजीपीसी अनिवासी विभाग सुरू करणार असल्याचे मनजीत सिंग यांनी सांगितले आहे.