पक्षनेते एकनाथ पवार यांनी घेतली स्मृती ईराणी यांची दिल्लीत भेट, स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ
- नेत्यांच्या मनामध्ये शंका-कुशंकांना मिळाला वाव
- दोघांमधील चर्चा जाणून घेण्याची लागली उत्सुकता
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांच्या या भेटीने पिंपरी-चिंचवडच्या राजकीय क्षेत्रात संशयाचे वारे घोंघावत आहे. विकासात्मक चर्चा केल्याची पोस्ट पवार यांनी फेसबुकवर अपलोड केली आहे. मात्र, शहरातला एकही नेता सोबत नसताना पवार यांनी ईराणींसोबत कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत नेत्यांच्या मनामध्ये शंका-कुशंका निर्माण होऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांना ही चर्चा जाणून घेण्यासाठी कमालीची उत्सुकता लागली आहे.
- केंद्रीय मंत्रीमंडळातील केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील महत्वाच्या पदाधिकारी मानल्या जातात. मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मागच्या पंचवार्षिकीत महत्वाचे निर्णयही घेतले आहेत. त्यामुळे इराणी या मोदींच्या अगदीच निकटवर्तीय मानल्या जातात. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काही प्रशासकीय अथवा निमशासकीय कामकाज असेल तर आयुक्त श्रावण हार्डीकर, महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि पक्षनेते एकनाथ पवार आणि ऐच्छीक पदाधिकारी मंत्र्यांच्या भेटीला जात असतात. मात्र, आयुक्त, महापौर आणि दोन्ही आमदार शहरात असताना एकनाथ पवार यांनी दिल्लीत जाऊन मंत्री ईराणी यांची भेट घेऊन फोटो काढले आहेत. त्यांच्याशी महत्वाच्या विषयांवर चर्चाही केल्याचे फेसबुक पोस्टमध्ये उल्लेखीत आहे. दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे एकनाथ पवार शहरात परतल्यानंतर सांगतील, याबाबत तिळमात्र शंका नाही.
परंतु, मंत्री ईराणी आणि पवार यांच्या भेटीने शहरातल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शहर भाजपमध्ये जुनेनवे, इतर पक्षातून भाजपत आलेले, सत्तेच्या लालसेपोटी पक्षात आलेले असे असंख्य गटतट आहेत. त्यामुळे कधी कोणता भाजपचा नगरसेवक सत्तेच्या विरोधात पत्रकबाजी करेल, याचा काही नेम नसतो. याची उदाहरणे देखील ज्वलंत आहेत.
- असंतोषाची वार्ता आणि मनातील खदखद?
- तो मुंडे गटाचा, हा गडकरी गटाचा, आम्ही जुने असून सुध्दा आम्हाला काल पक्षात आलेल्या आमदारांचे ऐकावे लागते, अशा वैचारीक टोकाला गेलेला असंतोष पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये खदखदत असताना दिसतो. अशा परिस्थितीत पवार यांनी दिल्ली गाठून मंत्री ईराणी यांची भेट घेतल्याने शहरात गटातटात विभागलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवार आणि ईराणी यांच्यात चर्चा कोणत्या विषयावर झाली, हे पाहणे त्यांच्यासाठी औत्सुक्याचे बनले आहे.