पंतप्रधानांनी घेतला पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पायाभूत विकासांचा आढावा घेतला. यात त्यांनी रस्ते, ग्रामीण आणि शहरी विकास, रेल्वे, विमानतळ आणि बंदर विकास प्रकल्पांची माहिती घेतली. निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी या विषयीचे सादरीकरण पंतप्रधानांना सादर केले. यावेळी रस्ते विकासाचा वेग कमालीचा वाढला असल्याचे दिसून आले आहे अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातर्फे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आज सरासरी रोज 26.93 किमी लांबीच्या रस्त्यांची बांधणी करण्यात येत आहे. सन 2013-14 मध्ये हा वेग दररोज 11.67 किमी होता. वाहनांच्या डिजीटायझेशनचाहीं आढावा यावेळी घेण्यात आला. त्यानुसार देशात आता 22 टक्के वाहनांचे टोल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतले जात आहेत.
सन 2014 ते 2018 या चार वर्षांच्या अवधीत देशातील 44 हजार गावे रस्त्यांनी जोडण्यात आली आहेत. त्याच्या आधीच्या वर्षात हा वेग 35 हजार गावे इतका होता. रस्त्यांच्या स्थितीचे जीपीआरएस मॅपिंग केले जात आहे. 20 राज्यांनी ही सिस्टीम लागू केली आहे. गेल्या चार वर्षात रेल्वेच्या 9528 किमी लांबीच्या मार्गाचे रूंदीकरण किंवा नवीन लाईन टाकण्याची कामे झाली आहेत. हे काम त्याच्या आधीच्या चार वर्षातील प्रमाणापेक्षा 56 टक्क्यांनी आधिक आहे असा दावा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये विमान प्रवाशांची संख्या 62 टक्क्यांनी वाढली आहे. उडान योंजनेअंतर्गत 27 विमानतळ वापरात आणण्यात आले आहेत. बंदरांमधील मालवाहतुकीचे प्रमाणही या चार वर्षात 17 टक्क्यांनी वाढले आहे असेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.