माध्यमांच्या स्वातंत्र्यावर मोदी सरकारचा घाला
- केजरीवालांचा आरोप
नवी दिल्ली – एका दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीवरील दोन वरीष्ठ पत्रकारांना मोदींच्या विरोधातील भूमिका महागात पडली असून त्यांना त्या वाहिनीची नोकरी सोडावी लागल्याचा आरोप असून त्यावरून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हा घाला असून त्याविषयी आता संघटीतपणे आवाज उठवण्याची गरज आहे अन्यथा खूप उशिर होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. एबीपी न्युज चॅनेलचे पुण्यप्रसुन वाजपेयी आणि मिलिंद खांडेकर या दोन वरीष्ठ पत्रकारांना आपली नोकरी सोडावी लागली आहे. त्याचे तीव्र पडसाद सोशल मिडीयात उमटले असून केजरीवालांनीही या घटनेची दखल घेत मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी प्रसार माध्यमे मुक्त असणे महत्वाचे आहे. पण या माध्यमांच्या स्वातंत्र्यावरच घाला घातला जात असून दोन वरीष्ठ पत्रकारांच्या या उदाहरणावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.
एबीपी न्युज वरील मास्टर स्ट्रोक हा कार्यक्रमही त्या वाहिनीने रद्द केला आहे. या वाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सरकारी योजनांतील लाभार्थ्यांशी चर्चा करून मोठे काम केल्याचा जो दावा करतात ते कसे खोटे असते हे अलिकडेच दाखवले होते. कृषी योजनांचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांशी झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमात एका महिलेने मोदींशी बोलताना सरकारी योजनांमुळे आपण पारंपारीक शेती ऐवजी सीताफळ लागवडीचा कार्यक्रम सरकारच्या मदतीने हाती घेतला त्यात आपले उत्पन्न दुप्पट झाल्याचे तिने सांगितले होते.
पण मास्टर स्ट्रोक या कार्यक्रमात याच महिलेची मुलाखत प्रसारीत करण्यात आली. त्यात तिने आपले उत्तन्न डबल झालेले नाही आपल्याला तसे सांगण्यास सांगितले गेले होते असे नमूद केले होते. मोदींच्या दाव्याना खोटे पाडणारा हा कार्यक्रम पुण्यप्रसुन वाजपेयी या पत्रकाराला भोगावा लागल्याचे सांगितले जात आहे.