न्यायालयीन कामकाज सुरू करा, अन्यथा वकिलांना १५ हजार द्या!
अमळनेर – मागील ५ ते ६ महिन्यांपासून न्यायालये बंद आहेत. न्यायालयीन कामकाज बंद असल्याने अनेक वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करावे अन्यथा शासनाने वकिलांना दरमहा १५ हजार रुपये सन्मानधन म्हणून द्यावेत अशी मागणी इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सशी संलग्न असलेल्या अमळनेर वकील संघाने केली आहे.
अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष शकील काझी, सचिव दिनेश पाटील यांनी यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषद अध्यक्ष यांना एक लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कामकाज बंद असल्याने वकिलांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यातून काही वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर काहींनी आत्महत्यादेखील केल्या आहेत. त्यामुळे एकतर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करावे, अन्यथा ते सुरू होइपर्यंत सर्व वकिलांना शासनाने दरमहा सन्मानधन म्हणून १५ हजार रुपये द्यावेत. यावेळी ज्येष्ठ वकील अशोक बाविस्कर व सर्व वकील उपस्थित होते.