नोकरदारांसाठी चिंता वाढवणारी बातमी; पुढील वर्षी लागू होणार नवीन वेतन नियम
मुंबईः करोना आणि लॉकडाउनमुळे सामान्य नागरिक होरपळून गेले होते. यातच नोकरदार वर्गाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून देशात नवीन वेतन नियम लागू होणार आहे. याचा हातात येणाऱ्या पगारावर परिणाम होणार आहे.
केंद्र सरकारने नवीन वेज कोड विधेयक २०१९ मध्ये मांडलं होतं. त्यानुसार हे विधेयक मंजूर होऊन कायदा अस्तित्वात आला आहे. त्यातील नियम एप्रिल २०२१ पासून म्हणजे लागू होणार आहेत. पुढील आर्थिक वर्षापासून वेतनाची नवीन व्याख्या लागू होणार आहे. यात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही वेतन रचनेत मोठे बदल होणार आहेत.
काय होणार परिणाम
- नव्या नियमानुसार कर्मचाऱ्याला दिले जाणारे भत्ते एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
- एप्रिल २०२१ पासून एकून पगारात मूळ पगार हिस्सा ५० टक्के वा त्यापेक्षा अधिक द्यावा लागणार आहे.
- या नव्या नियमाचा फटका जास्त पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू शकतो.
- नव्या नियमामुळे भत्त्यांची रक्कम कमी होणार आहे.
- पीए आणि ग्रॅच्युटी वाढणार असल्यानं कंपन्यांकडून हा आर्थिक भारही कर्मचाऱ्यांवरच टाकला जाण्याची शक्यता आहे.
कामगारांच्या वेतनासंदर्भात किमान वेतन कायदा-१९४८, वेतन वाटप कायदा-१९३६, बोनस वाटप कायदा-१९६५ व समान मोबदला कायदा-१९७६ असे चार कायदे अस्तित्वात आहेत. या चारही कायद्यांचे एकत्रित नव्या वेतन कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आले आहेत. कामगारांच्या वेतनाच्या केंद्र व राज्यांच्या व्याख्याही वेगवेगळ्या आहेत. नव्या कायद्यामुळे कामगारांच्या किमान वेतनाची देशभर एकसमान व्याख्या अस्तित्वात येईल.