5 वी ते 8 वी पर्यत शाळांची घंटा अद्याप वाजणार नाही – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई | प्रतिनधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून 5 वी ते 8 वी पर्यतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याची माहिती, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती दिली. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली. विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. मात्र लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सुचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने निदान सध्या तरी आम्ही पहिली ते आठवी पर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडली नाही अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
दहावी व बारावीच्या परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच परंतु काहीशा उशीरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सध्या जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सरकारचे प्रयत्न यामुळे आपण कोरोनाच्या संकटावर मात करून भविष्यातील वाटचाल उज्ज्वल करू असा आत्मविश्वास शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
…………………………….