नाथाभाऊ संघटनेतील वाद चव्हाट्यावर आणत आहेत, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
गेली दोन दिवस देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याला उत्तर दिले आहे. संघटनेतील वाद बंद खोलीत बसून संपवायचे असतात. नाथाभाऊ हे चव्हाट्यावर आणत आहेत. पक्षातील वरिष्ठ व्यक्ती नाथाभाऊंशी बोलत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात असल्याचे पाटील यांनी आज पिंपरीत सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीस यांनी ही जशासतसे उत्तर दिले. फडणवीस यांनी मला त्रास दिला. ज्यांच्यावर आरोप झाले, त्या सर्वांना फडणविसांनी क्लिनचीट दिली. मात्र, दाऊदशी माझा संबंध असल्याचा कांगावा करत मला मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले.
‘नाना फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ हे पुस्तक आपण लिहीत असल्याचेही खडसे यांनी जाहीर केले. या पुस्तकातून खरी कहाणी लोकांच्या समोर येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी फडणविसांना दिला. यावरून पिंपरीमध्ये पत्रकारांनी छेडले असता पाटील म्हणाले की, संघटनेत वाद असतात, ते वाद बंद खोलीत बसून संपवायचे असतात. नाथाभाऊ ओपनली मांडत आहेत, असेही पाटील यावेळी म्हणाले.
पिंपरी-चिंचवड येथील एमआयडीसीमधील भूखंड प्रकरणात खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. दाऊद फाऊदमुळे द्यावा लागला नाही. त्यात 24 तासात क्लीन चिट दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी हे सविस्तर सांगितले आहे, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.