नागपुरात 30 ते 40 जणांच्या टोळक्यांकडून 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
नागपूर : नागपुरात 20 ते 25 दुचाकी आणि काही ऑटोंची तोडफोड करण्यात आली आहे. एकाच वेळी 20 ते 25 गाड्यांची तोडफोड केल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. 30 ते 40 जणांनी मध्यरात्री येऊन ही तोडफोड केली असल्याचे म्हटलं जात आहे. नागपुरातील लष्करीबाग परिसरात ही घटना घडली आहे. मध्यरात्री 30 ते 40 जणांच्या टोळक्याने दुचाकी रस्त्यावर पाडल्या आणि तोडफोड करण्यात आली. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून पाचपावली पोलीसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहेत.
नुकतेच पुण्यातही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यात गुडांनी दहशत निर्माण करण्यासाठी तब्बल 55 गाड्यांची तोडफोड केली होती. यामध्ये रिक्षा आणि दुचाकींचा समावेश होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. आतापर्यंत अनेकदा पुण्यात गाड्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा दुचाकी आणि गाड्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत सर्वाधिक वाहन तोडफोडीच्या घटना पुण्यात घडल्याचे समोर आले आहे.