नरेंद्र मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते – प्रियंका गांधी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दांत टीका केली आहे. बिर्याणी खाण्यासाठी नरेंद्र मोदी 2015 मध्ये पाकिस्तानात गेले होते अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. काँग्रेस जिंकल्यास पाकिस्तानात टाळ्या वाजवल्या जातील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे असं विचारलं असता हा त्यांचा दृष्टीकोन आहे असं त्यांनी सांगितलं. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानचा दौरा करत तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती.
अयोध्या दौऱ्यावर असताना प्रियंका गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी बोलताना राम मंदिराचं प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्या कारणाने आपण तिथे जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
याआधी शुक्रवारी फैजाबादमध्ये बोलतानाही प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत, प्रधानमंत्री फक्त श्रीमंताची भेट घेतात आणि शुभेच्छा देतात. त्यांच्याकडे गावाकडील लोकांना भेटण्यासाठी वेळ नाही असा टोला लगावला होता. प्रियंका गांधींनी सांगितलं की, ‘मी पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ वाराणसीतील एका गावातील लोकांना येथे विकास झाला आहे का अशी विचारणा केली. यावर त्यांनी सांगितलं की, १५ किमीचा रस्ता बांधण्यात आला आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच त्याला मंजुरी मिळाली होती. रस्ता तयार करण्यात आल्यानंतर त्याच्या नावे प्रचार केला जात आहे’. पुढे त्या म्हणाल्या की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात अनेक ठिकाणी फिरले, पण आपल्या मतदारसंघातील गावातील लोकांना भेटण्यासाठी कधीच आले नाहीत. जर त्यांना गावांसंबंधी माहितीच नसेल तर ते विकास कसा करणार’.
प्रियंका गांधी यांनी मोदींवर अत्यंत तिखट शब्दांत टीका करत विचारणा केली की, ‘जर तुम्ही लोकांचा आवाज ऐकू शकत नसाल तर मग कोणती सत्ता तुमच्या हाती आहे ? तुमच्या सत्तेने लोकांना काय फायदा मिळाला?’. पुढे त्यांनी म्हटलं की, ‘नरेंद्र मोदींनी गेली पाच वर्ष फक्त खोटं बोललं आहे. तरुण बेरोजगार फिरत आहेत. त्यांना तरुणांची कसलीही चिंता नाही. पंतप्रधानांकडे गरिबांसाठी वेळ नाही. भाजपा सरकार जनताविरोधी आणि शेतकरी विरोधी आहे. या सरकारसमोर जनतेची सुनावणी होत नाही आहे’.