धोनीचे मार्गदर्शन नेहमीच बहुमोल – ऋषभ पंत
लंडन – भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आणि अर्थातच यशस्वी यष्टीरक्षक कोण असे विचारले, तर महेंद्रसिंग धोनीचे नाव घेण्यासाठी विचारही करावा लागणार नाही. धोनीची कारकीर्द अखेरच्या टप्प्यात असताना त्याचा वारसदार म्हणून ज्यांची नावे घेतली जात आहेत, त्यात धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतचे नाव सर्वात वर आहे. सध्या भारतीय संघाबरोबर इंग्लंडमध्ये असलेल्या पंतने आपल्या यशाचे श्रेय धोनीलाच दिले आहे.
वास्तविक पाहता ऋषभ पंतची क्षमता पाहता इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी त्याला संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु अज्ञात कारणांमुळे पंतला टी-20 मालिकेत किंवा एकदिवसीय मालिकेतही संधी मिळाली नाही. मात्र याची भरपाई व्हावी असा निर्णय लवकरच जाहीर झाला आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात ऋषभ पंतची निवड झाली. भारत अ संघाकडून अनेक मालिकांमध्ये पंतने बजावलेल्या कामगिरीमुळेच त्याला ही संधी मिळाली आहे. परंतु कसोटी संघापर्यंत मजल मारता आल्याचे श्रेय धोनीला देताना पंत हात राखून बोलत नाही.
मला जेव्हा जेव्हा आधाराची गरज भासली, मार्गदर्शनाची गरज भासली, तेव्हा तेव्हा मी थेट माहीभाईकडे गेलो आणि मला कधीही निराश व्हावे लागले नाही, असे सांगून पंत म्हणाला की, आयपीएल स्पर्धेत करार मिळण्याची बाब असो, की यष्टीरक्षणाबाबतीत मार्गदर्शन असो, त्याने मला नेहमीच योग्य आणि बहुमोल सल्ला दिला आहे. यष्टीरक्षण करताना शरीराचा समतोल राखण्यापेक्षाही मस्तक आणि हात यातील समन्वय अधिक महत्त्वाचा असतो, असे त्याने मला बजावले आहे.मी त्याच्या सल्ल्याचे बिनचूक पालन करतो आणि त्याचा मला प्रचंड फायदाही झाला आहे. भविष्यातही कोणत्याही अडचणीसाठी मी थेट माहीभाईकडेच जाईन आणि मला योग्य सल्ला मिळेल अशी माझी खात्री आहे.