धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच, मोदी किंवा उमा भारतींना नाही : काँग्रेस नेता
राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. नाथद्वारा येथे प्रचारसभेत सी पी जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहे. धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच असून मोदी किंवा उमा भारतींना नाही, असे विधान त्यांनी केले आहे.
सी पी जोशी यांनी प्रचारसभेत धर्म, जात यावरुन भाजपावर टीका केली. मात्र, टीका करताना बेताल विधान करुन जोशी यांनी वाद ओढावून घेतला. जोशी म्हणाले, उमा भारती कोणत्या जातीच्या हे माहित आहे का कोणाला ?. ऋतंभरा यांची जात कोणाला माहित आहे का?, उमा भारती लोधी समाजाच्या आहेत आणि त्या हिंदू धर्मावर भाष्य करतात. साध्वीजी कोणत्या धर्माच्या आहेत, त्या हिंदू धर्मावर आहे. नरेंद्र मोदींचा धर्म काय, जात कोणती आणि ते हिंदुत्वावर बोलत आहे. ५० वर्षात त्यांच्या ज्ञानात भरच पडली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. देशात धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच असतो. कारण त्यांना धर्माबद्दलची माहिती असते, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष हिंदू नाही, असं ते म्हणतात. पण त्यांना प्रमाणपत्र वाटत फिरण्याचा अधिकार कोणी दिला?, त्यांनी काय विद्यापीठ सुरु केले आहे का?, असा सवाल त्यांनी भाजपाला उद्देशून विचारला. सरदार पटेल हे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात होते. पटेल यांनी नेहमीच नेहरुंना पाठिंबा दिला. नेहरुंच्या परवानगीशिवाय ते कोणतेही निर्णय घेत नव्हते. पण आज लोकांमध्ये नेहरु- पटेलांमध्ये मतभेद होते, अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे त्यांनी नमूद केले. या विधानावरुन वाद निर्माण होताच त्यांनी स्पष्टीकरणही दिले. ‘माझ्याविधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून भाजपा याचाच वापर करत आहे, असे त्यांनी नमूद केले
तर बुधवारी एका सभेत सी पी जोशी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस राम मंदिर बांधणार, असे आश्वासन दिले होते. भाजपा लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे. अटलबिहारी वाजपेयींनी त्यांच्या कार्यकाळात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात काहीच बदल घडवू शकले नाही, असे त्यांनी म्हटले होते.