धर्मांध व दहशतवादी गटांच्या सहभागामुळे पाकिस्तान निवडणूकीवर चिंतेचे सावट
कराची – पाकिस्तानात येत्या 25 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत अनेक धर्मांध व कट्टरपंथीय दहशतवादी संघटनांनी आपले उमेदवार उभे केल्याने पाकिस्तानातील निवडणुकीवर चिंतेचे सावट पसरले असून देशाच्या लोकशाही आणि उदारमतवादी विचारसरणीपुढेही मोठे आव्हान निर्माण झाले असल्याची भावना तेथे व्यक्त केली जात आहे.
तेथे अलिकडेच स्थापन झालेल्या तहरीक ई लाबाईक पाकिस्तान आणि अल्ला हो अकबर तेहरीक या कट्टरपंथीय संघटनांनी तेथे दोनशे पेक्षा अधिक उमेदवार उभे केले आहेत. नॅशनल ऍसेम्ब्लीच्या चारही प्रांतातील निवडणुकांमध्ये त्यांचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यातील अल्लाहो अकबर तहरीक ही लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचीच राजकीय आवृत्ती आहे असे सांगितले जात आहे. त्यांनी पंजाब आणि खैबर पख्तुनवा प्रांतात एकूण 50 उमेदवार उभे केले आहेत.
हाफिज सईदच्या मिल्ली मुस्लिम संघटनेला निवडणूक लढवण्यास अनुमती नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी एएटी पक्षामार्फत आपले उमेदवार उभे केले आहेत. धर्माचे राजकारण करणाऱ्या मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी तेथे एकत्रित पणे मुत्तहिदा मजलीस अमल ही राजकीय आघाडी स्थापन केली असून त्यांनीही मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले आहेत. या संघटनांच्या उमेदवारांविषयी डॉन या वृत्तपत्राने आपल्या संपादकीयात म्हटले आहे की त्यांच्या राजकीय आव्हानामुळे सर्वच लोकशाहीं आणि लिबरल वातावरणाला धोका निर्माण झाला असून ही चिंतेची बाब आहे. निवडणूक विषयक नियमावलीनुसार या सर्वच उमेदवारांनी लोकशाही प्रक्रियेशी बांधिलकी जपण्याचे व हिंसाचार सोडून देण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे तथापी त्यांच्या या प्रतिज्ञापत्रावर पुर्णपणे विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही असेही तेथील काही विचारवंताना वाटत आहे. या गटांनी प्रचारातही जहाल धार्मिक कट्टरतावादी भाषा प्रचारात वापरली आहे. त्यामुळे हे भीतीचे सावट आणखीनच गडद झाले आहे.