दोन महिन्यात महाराष्ट्र कोरोना मुक्त होऊ शकतो; ‘गुर्जो’ काढाचा विचार करा : मिलिंद एकबोटे
पुणे । राज्यात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी आयुर्वेदिक औषधी सध्या उपलब्ध आहे. ज्याला गुर्जो काढा असले म्हटले जाते. त्याबाबत राज्य सरकारने गांभीयपूर्वक विचार करावा, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.
याबाबत एकबोटे म्हणाले की, बायोकॉन या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लस बनविली असून तिच्या इंजेक्शनची किंमत रु. ८०००/- असेल, असे संचालिका श्रीमती किरण मुजुमदार शॉ यांनी जाहीर केले आहे. यावेळी तुंगारेश्वर पर्वत ( ता.वसई) येथील पूजनीय बालयोगी श्री सदानंद महाराजांची आठवण येणे स्वाभाविक आहे. श्री महाराजांनी सांगितलेल्या संकल्पनेप्रमाणे मान्यवर आयुर्वेदाचार्यांनी ३४ वनस्पतींचा ‘गुर्जो’ काढा बनवला असून तो असंख्य लोकांनी वापरला आहे.
या काढ्याची उपयोगिता कोरोना रोगप्रतिबंधक म्हणून झालेली आहेच, शिवाय अनेक कोरोनाग्रस्त रूग्णांना या काढ्याची मदत झाली आहे. अनेक रुग्णांनी आपले सकारात्मक अभिप्राय कळवले आहेत. या काढ्याची किंमत फक्त रु. १२५ / १०० मि.ली अशी आहे. कुठे ८००० रु. आणि कुठे १२५ रु…! जे काम अतिशय स्वस्तामध्ये आणि परिणामकारक होऊ शकते त्याच्याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. पूजनीय सदानंद महाराज आज सुध्दा सांगत आहेत की “कोरोना रोग आटोक्यात आणणे फारसे अवघड नाही. फक्त २ महिन्यांच्या अवधीमध्ये किमान महाराष्ट्र प्रांत कोरोनामुक्त करणे शक्य आहे.” श्री महाराजांच्या संकल्पनेप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी ‘अग्निमोदक’ हे आयुर्वेदिक औषध बनवण्यात आले असून त्याची किंमत फक्त रु. १२५०/- आहे. श्री महाराजांच्या संशोधनाचा आणि ज्ञानाचा उपयोग केला तर महाराष्ट्र राज्याचा कोरोनाच्या उपाययोजनेसाठी होणारा प्रचंड खर्च वाचेल आणि असंख्य रुग्णांचा मानसिक ताण आपोआप थांबेल, असा विश्वास एकबोटे यांनी व्यक्त केला आहे.