‘दुधाचे दर वाढवा अन्यथा आंदोलन करू’- स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेचा इशारा
दुधाचे दर वाढवण्याबाबत आणि अनुदान देण्याबाबत दूध आंदोलनाला पुन्हा एकदा नक्कीच उकळी फुटणार आहे. तसेच दूध निर्यातीला परवाना द्या अशा विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना आंदोलन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे आंदोलन तीव्र झाले तर मात्र दूग्ध व्यवसाय नासण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन जाहीर केल्याने राज्यात रोज तब्बल ५२ लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. यामुळे सध्या राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांचे अर्थकारणच ‘डाऊन’ झाले आहे. अतिरिक्त दूधाचे पावडर करण्याचा निर्णय संघांनी घेतला. अचानक त्याचेही दर आंतरराष्ट्रीय स्तरावर निम्यावर आल्याने राज्यात सध्या पन्नास हजार टन पावडर गोडावूनमध्ये लॉक झाले आहे. संघांची ही अवस्था असतानाच शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने दूग्ध आंदोलन चिघळण्यची शक्यता आहे.
राज्यात सध्या ३२६ दूधसंघ असून त्यामध्ये १०७ सहकारी व २१९ खासगी आहेत. या संघाकडून रोज जवळजवळ १ कोटी १९ लाख लिटर दूध संकलन होते. लॉकडाऊन नसताना त्यामधील ८६ लाख लिटर पॅकिंगव्दारे विक्री होत होती. लॉकडाऊन काळात ६७ लाख लिटर दूध पॅकिंगव्दारे विक्री होत आहे. हॉटेल, मिठाई व अन्य दूग्धजन्य पदार्थ यासाठी होणारा वापर प्रचंड कमी झाल्याने रोज तब्बल ५२ लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. यामुळे या दुधाचे करायचे काय असा प्रश्न संघासमोर आहे. यातील केवळ पाच लाख लिटर दूध राज्य सरकार खरेदी करून त्याची पावडर करत आहे. इतर दुधाचे पावडर करण्याची वेळ संघावर आली आहे.तसेच राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला ट्विट करून 21 जुलैला आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
दोन तीन महिन्यापूर्वी या पावडरचा दर ३२० ते ३३० रूपये होता. पण तो देखील अचानक घसरला. सध्या त्याचा दर १८० ते २०० रूपये झाला आहे. त्याची परदेशात होणारी निर्यात बंद झाली आहे. यामुळे बहूतेक दूधसंघाकडे ही पावडर पडून आहे. हा आकडा किमान पन्नास हजार टनापर्यंत आहे. यातच केंद्राने दहा हजार टन पावडर आयात करण्याचा निर्णय घेतल्याने संकटात नवे संकट येणार आहे. बाजारात दर नाही, त्यामुळे त्याची विक्रीच बंद झाल्याने संघांचे कोट्यवधीचे भांडवल अडकून पडले आहे. म्हणूनच दूधाचे दर वाढवा अश मागणी या संघानं केली आहे .