दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका निकृष्ट दर्जाच्या
शिक्षक, विद्यार्थ्यांकडून तक्रार
राज्य मंडळाच्या दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या कागदाचा दर्जा यंदा खालावला असल्याची तक्रार शिक्षक आणि विद्यार्थी करत आहेत. उत्तरपत्रिकांची शिवण उसवून पाने सुटी होत असल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी, बारावीची परीक्षा सध्या सुरू आहे. यंदा कृतिपत्रिका तुलनेने सोप्या असल्याचे विद्यार्थ्यांचे मत असले तरी विद्यार्थ्यांना सध्या वेगळ्याच चिंतेने घेरले आहे. परीक्षा केंद्रावर जमा केलेल्या उत्तरपत्रिका सुखरूपपणे परीक्षकांच्या हती पडणार का अशी शंका विद्यार्थी व्यक्त करत आहेत. उत्तरपत्रिकांसाठी वापरण्यात आलेल्या कागदाचा दर्जा खालवाला असल्याचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी सांगितले. टोकदार पेन्सिलने आकृत्या काढल्यास कागद फाटत आहे. त्याचप्रमाणे शाईपेन, जेल पेन यांची शाई कागदावर फुटत आहे, खोडरबरने खोडल्यासही कागद फाटत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकांची शिवणही सुटत असल्याची तक्रार पर्यवेक्षक आणि शिक्षकांनी केली. पानाच्या जोडय़ांना मधून शिवण घातली जाते. मात्र अनेक उत्तरपत्रिकांमध्ये एकेक पान जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे शिवण उसवल्यास मधलीच पाने सुटत असल्याची शिक्षकांची तक्रार आहे.
‘विद्यार्थ्यांना स्टेपलर आणण्यासही परवानगी नाही. दोऱ्याने उत्तरपत्रिका आणि पुरवण्या बांधण्यात येतात. त्यामुळे उसवलेल्या उत्तरपत्रिकांना स्टेपलर मारून त्या जमा कराव्या लागल्या आहेत,’ अशी माहिती शिक्षकांनी दिली.