थेट पध्दतीने भाजीपाला व फळांचे स्टॉल लावून विक्री करण्यास परवानगी – नाना काटे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर या भागामध्ये पूर्वी ज्या प्रमाणे प्रत्येक सोसायट्यामध्ये शेतक-यांव्दारे शासनांच्या सर्व नियमांचे पालन करुन भाजी – फळांची विक्री करण्यात येत होती हिच पध्दत कोरोना संसर्गांच्या पार्श्वभूमीवर योग्य आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर येथे पूर्वी प्रमाणेच सोसायट्यामध्ये थेट पध्दतीने भाजीपाला व फळांचे स्टॉल लावून विक्री करण्याबाबत परवानगी व सुचना देण्यात याव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गांमुळे पूर्ण देशात संचार बंदी लागू करण्यात आलेली आहे. नागरीकांना अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर पडण्यास मनाई आहे. या अनुषंगाने मनपाने शहरातील नागरीकांच्या सोईसाठी सुमारे ४६ ठिकाणी सकाळी ११ ते ४ या वेळेत भाजी –फळे विक्री केंद्रे चालू करणार असल्याचे समजते. पिंपळे सौदागर येथे प्रभागातील नागरिकांनकरिता दररोज सकाळी ११ ते ४ या वेळेत राजमाता जिजाऊ उद्यान कुणाल आयकॉन रोड आणि गोविंद यशदा चौक येथे भाजी – फळांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
वस्तुत: पिंपळे सौदागर हा भाग पुण्यातील आय.टी. हब म्हणून ओळखल्या जाणा-या हिंजवडी येथून जवळच आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर मध्ये बहुताश: उच्च शिक्षित आय.टी. कर्मचारी राहत आहेत तसेच हा भाग पूर्णपणे विकसित असा आहे. या भागात मोठमोठे गृह प्रकल्प आहेत, या प्रकल्पांमध्ये २०० ते ३०० सदनिका आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतक-यांकडून माल घेऊन थेट ज्या सोसायटीमध्ये मागणी आहे तिथे भाजी –फळांचा स्टॉल लावला जातो. सोसायटीचे पदाधिकारी समन्वय साधून शासन, मनपाच्या नियमांचे पालन करुन सोशल डिस्टनिंगचे पालन करुन सदनिकाधारकांना या स्टॉलवर सोडतात त्यामुळे सोसायटीच्या बाहेर न पडता शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन थेट शेतक-यांकडून ताजा व रास्त किमंतीमध्ये भाजी व फळे येथील नागरीकांना मिळतात. वरील ठिकाणी भाजी – फळे केंद्र चालू केल्यास सर्व सोसायट्यांमधील नागरीक एकाच वेळी या केंद्रावर गर्दी करु शकतात. सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळणे अवघड होईल. त्यामुळे मनपाच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. तसेच कोरोनामुळे नागरीकही घाबरलेले आहेत त्यामुळे वरील निर्धारीत ठिकाणी भाजी घेण्यासाठी नागरीक जाणार नाहीत.