“भाजप सोडून परत या, तुम्हाला पुन्हा निवडून आणू” – अजित पवार
मुंबईः “पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना आहे. त्यामुळे आता जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप तगडा उमेदवार देईलच. पण आम्ही तिनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणू”, असं गणित मांडलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना अजित पवार यांनी ‘घरवापसी’ची साद घातली आहे.
हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. “ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आता राजीव आवळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांनी प्रवेश केला. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजूनही अनेक जण तिकडे गेले. पण आता त्यांनाही आघाडी सोडून का गेलो? असं वाटायला लागलंय, अशी सद्यस्थिती असल्याचंही पवार म्हणाले.
वाचाः स्थायी समितीतील ‘त्या’ राड्याचा निषेध; शिवसेना, राष्ट्रवादीची ‘हेल्मेट एन्ट्री’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘मेगा भरती’
“विविध पक्ष, प्रांत आणि समाजातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. विरोधकांनी निवडणुकीवेळी अनेक आश्वासनं आणि प्रलोभनं देऊन त्यांना पक्षात घेतलं होतं. पण आता येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असं अजित पवार म्हणाले.