थांबा नसलेल्या रेल्वेगाडीतून उतरणे प्रवाशाच्या जीवावर बेतले
थांबा नसलेली रेल्वे गाडी स्थानकात हळू झाल्यानंतर तिच्यातून खाली उत्तरणे एका नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जीवावर बेतले. गाडीतून उतरताना बॅग दरवाजात अडकून झालेल्या अपघातात शहरातील न्यायालयात बेलिफ म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर विष्णूपंत वाळके (वय ५३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजता झाला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी, की वाळके हे नगरच्या नालेगावातील टांगे गल्लीत रहातात. ते शहरातील न्यायालयात बेलिफ म्हणून काम करतात. ते नगरहून रेल्वेने दररोज ये-जा करीत असतात. आज म्हैसूर-वाराणसी या गाडीतून ते नगरहून बसले. शहरात या गाडीला थांबा नव्हता. ही गाडी स्थानकात येताच हळू झाली. त्यांच्याबरोबर असलेले सुमारे पंधरा प्रवासी गाडीतून उतरले. मात्र वाळके हे गाडीतून उतरत असताना त्यांची बॅग ही दरवाजाला अडकली. त्यामुळे रेल्वे फलाट व रेल्वेगाडी यांच्यात पाय अडकून अपघात झाला. त्यांच्या मेंदूला जबर मार लागला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वाळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच न्यायालयातील कर्मचारी व वकील रेल्वे स्थानकावर आले. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नगरला नेण्यात आला. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ , बहिणी असा मोठा परिवार आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.