‘डॅमेज कंट्रोल’ रोखण्यासाठी कर्नाटक सरकारचे कसोशीचे प्रयत्न
कर्नाटकातल्या ११ आमदारांनी राजीनामा दिल्याने तिथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये जेडीएसच्या ३ आणि काँग्रेसच्या ८ आमदारांनी शनिवारीच राजीनामा दिला. ज्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी राज्यातले डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमेरिका दौरा सोडून तातडीने कर्नाटकात दाखल झाले. आता कर्नाटकात राजकीय खलबतं सुरू झाली आहेत. तिथे काय होणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे. अपक्ष आमदार आणि मंत्री नागेश यांनीही पदाचा राजीनामा देऊन कर्नाटक सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. या सगळ्यामागे भाजपा आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे.
कर्नाटकच्या राजकीय अस्थिरतेचा मुद्दा लोकसभेतही मांडला गेला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही माहिती दिली. इतकंच नाही तर आम्ही हा मुद्दा उचलून धरू. मात्र आम्ही नेमके काय करणार आहोत ते स्पष्ट करणार नाही कारण आमच्या मते भाजपा हा पक्ष एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे वागतो आहे. त्यामुळे आम्ही आमची नेमकी भूमिका काय असेल ते स्पष्ट करणार नाही असे चौधरी यांनी म्हटले आहे. दरम्यान रात्रभर झालेल्या खलबतांनंतर आम्हाला सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर चालतील असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते. दरम्यान काँग्रेस नेते डी. के. सुरेश यांनी कर्नाटक सरकारमध्ये समाविष्ट असलेले सगळे मंत्री राजीनामा देण्यासाठी जात असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तसेच कर्नाटकमध्ये अस्थिरता येण्यासाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. एकाही राज्यात आपल्या शिवाय कोणत्या पक्षाचं सरकार असूच नये असं भाजपाला वाटतं आहे त्यामुळे त्यांनी फोडाफोडीचे राजकारण केले आहे असा आरोपही सुरेश यांनी केला आहे. तसेच भाजपा लोकशाही नष्ट करण्याच्या वाटेवर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान तासाभरापूर्वी काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि इतर मंत्री हे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या घरी पोहचले आहेत. आम्ही फक्त ब्रेकफास्टसाठी आलो आहोत असे हे सगळे सांगत असले तरीही प्रत्यक्षात कर्नाटकातले डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी हे सगळे नेते एकत्र आले आहेत यात शंका नाही.
कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तेव्हापासूनच हे सरकार अस्थिर केलं जाणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. लोकसभा निवडणूक संपेपर्यंत कर्नाटकात या घडामोडी घडल्या नाहीत. मात्र शनिवारी जेव्हा ११ आमदारांनी राजीनामा दिला तेव्हा या घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटकातलं सरकार स्थिर आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे. मात्र प्रत्यक्षात कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून या अस्थिरतेतून ते सावरणार की भाजपाला पुन्हा कर्नाटकात कमळ फुलवण्याची संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.