ठाण्यात साखरेच्या गोदामावर राष्ट्रवादीची धाड
ठाणे – पाकिस्तामधून साखर आयात केल्यानंतर केंद्र सरकारवर राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कल्याण तालुक्यातल्या दहिसर मोरी गावातील साखरेच्या गोडाऊनवर धाड टाकली. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
भारतीयांना उद्वस्त करण्यासाठी पाकचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजप सरकारने आखले आहे. मात्र, त्यांचे हे धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे म्हणत पाकची ही साखर आमच्या देशात विकू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजार भावापेक्षा 1 रुपयांनी कमी किमतीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. राज्यामधील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात आहेत, असे असताना पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात करण्यात येणार असल्याची माहिती मी डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाला दिली होती. या आधी पाकिस्तानी कांदा भारतात आणून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले होते.
आता साखर आणून आमच्या ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट भाजप सरकारने आखला आहे. ही पाकिस्तानी साखर आम्ही बाजारात विकू देणार नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी साखरेवरून मनसेही आक्रमक
केंद्र सरकारने पाकिस्तानातून तब्बल 60 ते 65 लाख मेट्रिक टन साखर आयात केल्याने नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. पाकिस्तानची साखर विकत घेऊ नये तथा विकू नये अन्यथा कायदा हातात घेऊ, असा इशारा नवी मुंबई मनसेने एपीएमसीतील व्यापाऱ्यांना दिला आहे. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देऊ, असे मनसे उपशहराध्यक्ष विनोद पार्टे यांनी व्यापाऱ्यांना बजावले आहे. मागच्या दोन वर्षात तुरडाळीचा घोळ करून या सरकारला या वर्षी साखर उद्योग अडचणीत आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायचे आहे का ? असा सवाल मनसे उपशहराध्यक्ष निलेश बाणखेले यांनी उपस्थित केला आहे.