ज्योतिरादित्यांना भाजपात सन्मान मिळणार नाहीः राहुल गांधी
नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी आपले मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्योतिरादित्य शिंदेंनी आपली विचारधारा खिशात ठेवली आहे. परंतु, त्यांना लवकरच याची जाणीव होईल की, त्यांनी काय केले आहे. भाजपत त्यांना सन्मान मिळणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य यांच्याबरोबरील आपल्या मैत्रीची आठवण सांगताना म्हटले की, मी त्यांची विचारधारा चांगल्या पद्धतीने जाणतो. परंतु, त्यांनी राजकीय भविष्यासाठी विचारधारेचा त्याग केला आहे. ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे काँग्रेस आणि दुसरीकडे भाजप-आरएसएस आहे. मी ज्योतिरादित्य यांची विचारधारा जाणतो. ते महाविद्यालयातही माझ्याबरोबर होते. मी त्यांना चांगला ओळखतो.
राजकीय भविष्यासाठी विचारधारेला तिलांजली देण्याचा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, ते आपल्या राजकीय भविष्याबाबत चिंतेत होते. त्यांनी आपली विचारधारा सोडली आणि आरएसएसबरोबर ते गेले. त्यांनी आपली विचारधारा आपल्या खिशात घातली आहे. लवकरच त्यांना जाणीव होईल की, त्यांनी काय केले आहे. ते आपल्या राजकीय भवितव्याबाबत घाबरले होते.