जोरजबरदस्तीने जशाच्या तशा कृषी कायदा राज्यात लागू होणार नाही – मुख्यमंत्री
मुंबई – केंद्र सरकारने अचानक कृषी कायदा केल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि अडचणी यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांनो काळजी करू नका. तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. हमखास भाव मिळेल असे पीक घ्या, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. केंद्राने जो कृषी कायदा मंजूर केला त्याचे फायदे आणि फटके कोणते ? याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
“केंद्र सरकारने जे कृषी धोरण मंजूर केलेलं आहे. त्याचे फायदे किंवा त्याचे फटके आपल्याला काय बसतील? त्याबद्दल देखील विचार सुरू आहे. आपल्या हिताचं काय? शेतकऱ्यांच्या हिताचं काय? हे पाहिलं जात आहे. माझं असं म्हणनं नाही की सगळचं काही बरोबर किंवा चुकीचं आहे. जे बरोबर असेल त्याचा जरूर आम्ही स्वीकार करू. पण जर अयोग्य असेल व जर कुठं शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडणार असेल, तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही. हे आपल्या राज्याचं धोरण आहे. आम्ही जे करू ते जनतेच्या हिताचं करू, शेतकऱ्यांच्या हिताचं करू. उगाचच काहीतरी कायदा आला आहे, म्हणून तो जसाच्या तसा.. चांगला असेल तर आनंदच आहे. पण जर का तसा नसेल तर मात्र या सर्व संघटनांशी आम्ही बोलतो आहोत. त्यांच्याकडून विविध सूचना येत आहेत. काही आक्षेप आहेत. काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे, यावर देखील विचार केला जात आहे.
महत्वाची बाब म्हणजे राज्यात हा कायदा लागू होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यात हा कायदा लागू होणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरजबरदस्तीने जशाच्या तशा हा कृषी कायदा राज्यात लागू होणार नाही, असे म्हटले आहे. केंद्राच्या कृषी कायद्यावर शेतकऱ्यांसह अन्य तज्ज्ञांशीही चर्चा सुरु. असल्याची माहितीही दिली आहे.