जीना हाऊस आमचेच; भारताने पाकला सुनावले
पाकिस्तानचे संस्थापक बॅ. मोहम्मद अली जीना यांचा मलबार हिल येथील बंगला आमचाच असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानचा दावा फेटाळला आहे. या मालमत्तेशी पाकिस्तानचा काहीच संबंध नसून ही भारत सरकारची मालमत्ता आहे आणि जीना हाऊसचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
मोहम्मद अली जीना यांनी १९३५-३६ मध्ये मलबार हिल येथे बंगला बांधला. भूखंडाचा आकार १२ हजार ७१८ चौरस मीटर असून त्यातील १९०४.५० चौरस मीटरवर बंगल्याची दुमजली मुख्य वास्तू उभी आहे. याच बंगल्यात १९४६ मध्ये जीना व पंडित नेहरू यांच्यात फाळणी टाळण्याबाबत चर्चा झाली होती. सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांनीही या बंगल्यात जीना यांच्यासह चर्चा केली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश उच्चायुक्तालयाकडे त्याचा ताबा गेला. १९८२ पर्यंत तो वापरात होता. बंगल्याचा ताबा १९९७ पासून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडे आला आहे.
गुरुवारी पाकिस्तानने मुंबईतील जीना हाऊस पाकिस्तानचे असून भारताने जीना हाऊस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास ते मान्य केले जाणार नाही, असे पाकने म्हटले होते. जीना हाऊसमध्ये पाकिस्तानचे मुंबईतील दुतावास सुरु करण्यासाठी ती जागा आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणीही पाकच्या वतीने केली होती.
या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला. जीना हाऊस हे भारताच्या मालकीचे असून तिचे नुतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हैदराबाद हाऊसच्या धर्तीवर जीना हाऊसचा वापर केला जाईल, असे रवीश कुमार यांनी सांगितले.