भाडेवाढीच्या मागणीसाठी रिक्षाचालक मध्यरात्रीपासून संपावर
मुंबई, ठाणे आणि राज्यातील रिक्षावाले आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढ त्वरित करावी, अवैध प्रवासी वाहतूक बंद करावी, ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा बंद कराव्यात या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत.
रिक्षाचालकांना भाडेवाढ मिळावी, रिक्षाचालक-मालक यांच्यासाठी असलेले कल्याणकारी मंडळ परिवहन खात्याच्या अंतर्गत असावे, ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा बंद करण्यात याव्यात अशाही मागण्या करण्यात आल्या आहे. परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या आहेत. पण त्यामध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत कोणतीही पावलं उचलली गेली नसल्याने रिक्षाचालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या?
रिक्षा भाडे चार ते सहा रुपयांनी वाढवावे
ओला, उबर सारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा बंद करावी
बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथकं नेमावीत
विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे कल्याणकारी महामंडळात भरले जावेत
चालक-मालकांना पेन्शन, ग्रॅज्युईटी, पीएफ आणि वैद्यकीय मदत दिली जावी
हकिम समितीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ करण्यात यावी