जनतेचा भाजपावरच विश्वास – मुख्यमंत्री
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर हिंसक आंदोलन सुरु असतानाही जळगाव आणि सांगली-मिरज व कुपवाडा महापालिकेसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवीत सत्ता काबिज केली. सरकारविरोधी वातावरण असतानाही या महापालिका निवडणूकांचा कौल भाजपाच्या बाजूने लागला असून आजही जनतेचा आमच्यावरच विश्वास असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेसाठी झालेल्या निवडणूकीत भाजापाचे कमळ फुलले आहे. या निवडणूकीत मिळालेल्या यशाबाबत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सांगली महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तरी जनतेने आम्हालाच कौल दिला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात आजही भाजपाबद्दल विश्वास असल्याचे ते म्हणाले.
मोदींनी विकासाचे जे राजकारण सुरू केले त्यावर जनतेचा आजही विश्वास आहे. या निकालावरून पुन्हा एकदा त्यावर मोहोर उमटल्याचे सांगत फडणवीस जनतेचे आणि भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.