राज्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षाच!; किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढेच
- राज्यातील किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढेच
पुणे |
अंशत: ढगाळ स्थिती आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह थेट राज्याकडे येत नसल्याने कडाक्याच्या थंडीतील विघ्न कायम आहेत. रात्री हवेत काही प्रमाणात गारवा असला, तरी राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढेच असल्याने डिसेंबरमध्ये या कालावधीत अपेक्षित असलेली थंडी जाणवत नाही. पुढील तीन ते चार दिवस तापमानात फार मोठ्या प्रमाणात बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
डिसेंबरच्या सुरुवातीपासून थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असताना अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आणि रात्रीची थंडी गायब झाली. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह सध्या सुरू आहेत. काश्मीर आणि हिमालयाच्या काही भागांत दोन दिवसांत हिमवृष्टीची शक्यता आहे. देशाच्या पश्चिम-उत्तर भागात काही ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वेकडील भागातही दोन दिवसांत तापमानात घट अपेक्षित आहे. अशात उत्तरेकडील वारे थेट राज्याच्या दिशेने येत नाहीत. परिणामी काहीसा गारवा असला, तरी तापमानात मोठी घट झालेली नाही. त्यामुळे कडाक्याच्या थंडीचा अनुभव अद्यापही नागरिकांना मिळालेला नाही.
महाबळेश्वरपेक्षा पुणे, नाशिक, औरंगाबाद थंड ’रात्रीचे किमान तापमान राज्यात सर्वच ठिकाणी सध्या सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी अधिक आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचे रात्रीचे तापमान सध्या वाढले आहे. ’त्या तुलनेत रविवारी पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी शहरांतील रात्रीचे किमान तापमान कमी होते. ’रविवारी पुण्यात राज्यातील नीचांकी १४.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. महाबळेश्वरचे किमान तापमान १५.० अंशांवर होते.