चार अल्पवयीन मुलांच्या हत्येने जळगाव हादरले
जळगाव – चार अल्पवयीन मुलांच्या हत्येने जळगाव हादरले आहे. जिल्ह्यातील रावेर येथे बोरखेडा रस्त्यानजीकच्या शेतामधील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. अज्ञाताकडून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मध्यप्रदेशातील मूळगावी गेले आहे. मात्र शेतातील घरात ही चार भावंडे एकटीच राहत होती. रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांची कुर्हाडीने हत्या केल्याचे पुढे आले आहे. आज सकाळी शेतमालक शेतात आल्याने हा सगळा प्रकार उघड झाला.
मृतांमध्ये १२ वर्षांची मोठी बहीण आणि तीन वर्षांय चिमुकलीचा समावेश आहे. तर एका भावाचे वय ११ वर्ष असूनदुसऱ्या भावाचे वय अवघे ८ वर्ष आहे. या लहान मुलांची हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप उलगडलेले नाही. मात्र या घटनेने रावेर शहर सुन्न झाले आहे.