ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीची तयारी; पराभूत उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीची बैठक
मुंबई – राज्यात नव्या वर्षात ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे जय्य्त तयारी चालू झाली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांसोबत चर्चा सुरू केली आहे. या पराभूत उमेदवारांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमदेवारांनाच या बैठकीला बोलावण्यात आले आहे.
वाचाः राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना शरद पवार देणार कानमंत्र
यावेळी या उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती, पराभवाची कारणे आणि उपाय याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या सर्वांचा विचार करून जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये कोरोना काळात झालेली कामे, राज्य सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि ही कामे मतदारसंघापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यावरही या बैठकीत भर देण्यात येणार आली.