गोरगरिबांसाठी दानशूर अन् स्वत: रक्तदान करुन एखाद्याला जीवदान देणारा आमदार!
– संवेदशनशील आमदार सुनील शेळके यांनी स्वत: केले रक्तदान
– राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिबीर
वडगाव मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्वत: रक्तदान करीत आणखी एक आदर्श निर्माण केला आहे. एखादा राजकारणी म्हणजे गोरगरिबांचे रक्त शोषण करणारा व्यक्ती…अशी टीका उपरोधिकपणे केली जाते. मात्र, याला अपवाद ठरवत ‘‘आमचा आमदार गोरगरिबांसाठी दानशूर आणि स्वत: रक्तदान करुन एखाद्याला जीवदान देणारा आहे,’’ अशी चर्चा मावळातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २१ वा वर्धापन दिन यावर्षी अत्यंत साध्या पण विधायक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणु आणि राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याला कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही उदंड प्रतिसाद दिला.
यावेळी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे उपाध्यक्ष सं तु सा का, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबुराव वायकर, सुभाषराव जाधव, अर्चनाताई घारे, जि प सदस्या शोभाताई कदम, मा सभापती विठ्ठलराव शिंदे, अशोकराव घारे, युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे, ग्रामीण ब्लाँक अध्यक्ष कैलास गायकवाड, पं स सदस्य साहेबराव कारके, कार्याध्यक्ष सुनिल भोंगाडे, महादुबुवा कालेकर, महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, देहुरोड अध्यक्ष कृष्णा दाभोळे, शितलताइ हगवणे, लोणावळा, वडगाव, तळेगाव, देहूरोड, पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ, सर्व पदाधिकारी सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी ‘रक्तदान शिबिर’ आयोजित करण्यात आली आहेत. ज्या पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन पक्ष आणि वरिष्ठांनी केले. ती जबाबदारी समजुन त्या सुचनेचे पालन करीत मी स्वतः आज वडगाव मावळ येथील शिबिरात रक्तदान केले.
नि:स्वार्थ भावनेने रक्तदान कारायला पाहिजे : आमदार शेळके
रक्तदान हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. रक्तदान हे नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवदान मिळणार आहे याची जागरुकता समाजात वाढविली पाहिजे. एक रक्तदाता म्हणून मला सांगायला आवडेल, की रक्तदानासंबंधी काहीजणांच्या मनात जी भीती असते ती तुम्ही प्रत्यक्ष रक्तदान केल्यावरच जाऊ शकते. रक्तदानासारखं कोणतंही श्रेष्ठ दान नाही. त्याचा आनंद प्रत्येकानं घ्यायला हवा, असे मला वाटते, अशा भावना यावेळी आमदार शेळके यांनी व्यक्त केल्या.