गायक उदित नारायण यांना रवी पुजारीच्या गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना अज्ञात गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खंडणीसाठी त्यांना ही धमकी देण्यात आली असून शिवीगाळही करण्यात आली आहे. याप्रकरणी उदित नारायण यांनी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी शाखेकडे आणि अंबोली पोलिसांत तक्रार दिली आहे.
Mumbai Police have forwarded the case of playback singer Udit Narayan, who alleged that he has been receiving threat calls from an unknown person for past one month, to anti-extortion cell (AEC) of the Mumbai crime branch. (File pic)
उदित नारायण यांच्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींकडून त्यांना आजवर तीन वेळा जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. जेव्हा ते शुटिंगच्या ठिकाणी असतात त्याचवेळी त्यांना हे फोन येतात. फोन करणारी व्यक्ती नेहमीच त्यांना रवी पुजारी असल्याचे सांगते आणि मोठी रक्कम देण्याची मागणी करण्यात येते. तसेच जर पैसे दिले नाहीत तर शिवीगाळ आणि जीवाशी मुकाल अशा धमक्याही दिल्या जातात, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, फोन करणाऱ्यांचे लोकेशन हे बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर ज्या फोनवरुन हे धमकीचे फोन येत आहेत तो फोन क्रमांक संबंधित सिमकार्डच्या कंपनीत उदित नारायण यांच्या वॉचमनचा नंबर म्हणून नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित वॉचमनचीही चौकशी केली, मात्र त्याने तीन महिन्यांपूर्वी आपला फोन चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले. फोन चोरीला गेला त्यावेळी हा वॉचमन बिहारमध्ये होता.
अंबोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या माहितीनुसार, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी उदित नारायण यांच्या घराच्या परिसरात साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले असून ते संशयित लोकांवर नजर ठेवून आहेत.