गर्दीच्या वेळी ‘हॉलिडे स्पेशल’ चालवू नका!
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे मध्य रेल्वेला आदेश
उपनगरीय रेल्वे वेळापत्रक सातत्याने विस्कळीत का, असा सवाल करत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. वेळापत्रकावर परिणाम होत असेल तर गर्दीच्या वेळेत हॉलीडे स्पेशल, मेल-एक्स्प्रेस चालवू नका, असे आदेशही त्यांनी दिले.
उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक, पादचारी पुलांची कामे, स्वच्छता अशा विविध विषयांवर गोयल यांनी शनिवारी सह्यद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडाबाबतही नाराजी व्यक्त केली.
या बैठकीत मध्य रेल्वेने वक्तशीरपणा सुधारण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ सादर केला. कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ला या पाचव्या-सहाव्या मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेग प्रती तास ९० वरून १०५ करणे, विक्रोळी-घाटकोपर, कल्याण- डोंबिवली दरम्यान अनेक वर्षांपासून असलेल्या वेग मर्यादेचे बंधन काढणे असे उपाय मध्य रेल्वे प्रशासनाने सादर केले.
उन्हाळी सुट्टीत सोडल्या जाणाऱ्या ‘हॉलिडे स्पेशल’ गाडय़ांमुळे उपनगरीय रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे गोयल यांना सांगण्यात आले. त्याचा आढावा घेतला असता उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक मोठय़ा प्रमाणात बिघडत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर गर्दीच्या वेळी हॉलिडे स्पेशल गाडय़ा का चालवता, असा सवाल गोयल यांनी करत गर्दीच्या वेळी हॉलिडे स्पेशल मेल—एक्स्प्रेस चालवू नका, असे आदेश दिले. तसेच उपनगरीय रेल्वेमधील बिघाड, सिग्नल व ओव्हरहेड वायर यासह अन्य तांत्रिक बिघाड जास्त होत असून ते होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. गेल्या महिनाभरापासून उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत होत असल्याबाबत मुंबईतील खासदारांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती. रेल्वे प्रवासी संघटनांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. या बैठकीत गोयल यांनी पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वेच्या वक्तशीरपणाबद्दल समाधान व्यक्त केले.
- मध्य रेल्वेच्या २०० हून अधिक मेल—एक्स्प्रेस दररोज मुंबईत येतात आणि मुंबईहून सुटतात. यावेळी एप्रिल-जून या तीन महिन्यांच्या कालावधीत पाचशेहून अधिक हॉलीडे स्पेशल सोडण्यात आल्या होत्या.
- केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी यापूर्वीही मुंबईतील उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यासंदर्भात वारंवार मध्य व पश्चिम रेल्वेला सूचना केल्या होत्या. तरीही वेळापत्रक सुधारले नव्हते.