आंबा विक्रीचा पुन्हा ‘महोत्सव’
पुणे- पणन मंडळाने मुख्यालयाच्या इमारतीजवळील अंतर्गत रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे स्टॉल उभारून आंबा विक्री करण्यास शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी बुधवारपासून पुन्हा आंबा विक्री करण्यास सुरूवात केली आहे. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
पणन मंडळातर्फे यावर्षीही “शेतकरी ते थेट ग्राहक विक्री’ या तत्त्वानुसार आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पणन मंडळासमोरील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्था, नवी दिल्ली छात्रवासच्या प्रांगणात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, 4 मे रोजी या महोत्सवास आग लागली. त्यामध्ये 60 ते 65 लाख रुपयांचा आंबा जळून खाक झाला. त्यानंतर डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थेने प्रांगणात आंबा महोत्सवतील स्टॉल लावण्यास मज्जाव केला. या पार्श्वभूमीवर महोत्सव कुठे सुरू ठेवायचा, हा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली.
त्यामध्ये पणन मंडळाच्या मुख्यालयाच्या इमारतीजवळील अंतर्गत रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे स्टॉल उभारून आंबा विक्री करण्यास शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, आगीत झालेल्या नुकसानीबाबत पणनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी आगीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत सध्या चर्चा करणे योग्य ठरणार नाही. उलट उत्पादित माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तो विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मंत्र्याच्या या निर्णयानुसार शेतकऱ्यांनी पुन्हा आंबा विक्री सुरू केली आहे.
खात्रीशीर आणि स्वस्त आंबे मिळणार
पणन मंडळाच्या वतीने आयोजित “शेतकरी ते थेट ग्राहक आंबा विक्री योजने’त नैसर्गिकरित्या पिकविलेले आणि खात्रीशिरपणे कोकणात उत्पादीत झालेला आंबा योग्य भावात उपलब्ध आहे. अधिकाधिक ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी केले आहे.