कुछ तो गडबड है ! : फडणवीस – राज्यपाल भेटीमुळे राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरून चांगलेच राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील विधानपरिषद निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आले.
त्यातच आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांना राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करावे अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने पाठवून ११ दिवस उलटले तरी राज्यपाल कोश्यारी यांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना लक्ष्य केले होते. राज्यपालांनी हा प्रस्ताव मंजूर करावा यासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत काही जणांनी भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. कोरोना उपाययोजना आणि पालघर येथे सांधुंसह तिघांचं हत्या प्रकरण याविषयी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली असली, तरी मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाविषयीदेखिल चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरु आहे.