खळबळजनक! …तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, सुशांत सिंगच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
पाटणा : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी बऱ्याच दिवसांनी आपलं मौन सोडलं आहे. त्यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. हे मी 25 फेब्रुवारी रोजीच वांद्रे पोलिसांना सांगितलेलं होतं. पण मुंबई पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाही. मुंबई पोलिसांनी तेव्हाच दखल घेतली असती तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता”, असा खळबळजनक दावा के. के. सिंह यांनी केलेला आहे.
“मुंबई पोलिसांकडे 25 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार करुनही त्यांनी काहीच केलं नाही. माझ्या मुलाचा 14 जून रोजी जीव गेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या 25 फेब्रुवारीच्या तक्रारीनुसार कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आम्ही चाळीस दिवस वाट पाहिली होती. पण मुंबई पोलिसांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी पाटणा येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली”, असं के. के. सिंह म्हणाले आहेत.
“पाटणा पोलिसांनी कारवाई सुरु केलेली आहे. पण आरोपी पळून गेले आहेत. सध्या पाटणा पोलिसांना मदत करायला हवी आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि मंत्री संजय झा यांचा मी आभारी आहे. त्यांनी सत्याची साथ दिली आहे”, असंदेखील के. के. सिंह म्हणाले आहेत.