क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीच्या डाव्या हातावर ‘असा’ असेल शिक्का
राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. परदेशातून परतल्यानंतर ज्यांना १०० टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटावी, यासाठी त्यांच्या डाव्या हातावर खास शिक्का उमटवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देखील दिली आहे.
केंद्र सरकारने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यात राज्य सरकारकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका या राष्ट्रांचाही समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे लोक बाहेरील बाधित ७ देशातून आले आहेत त्यांची विभागणी ही A, B, C अशा वर्गवारीत करण्यात येणार आहे. A म्हणजे ज्यांच्यात लक्षण आहे त्यांना वेगळं ठेवलं जाईल. B मध्ये ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्या आहेत त्या वयोवृद्धांना देखील १४ दिवस कॉरेंटाईन मध्ये ठेवण्यात येईल. या काळात त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं आढळली नाहीत तर तर त्यांच्यावर कोणताही उपचार होणार नाही.
परदेशातून परतल्यानंतर ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत त्यांना C वर्गात ठेवण्यात येणार आहे. त्यांना घरी कॉरेंटाईन करण्यात येईल. घरी कॉरंटाईन केलेल्या लोकांना निवडणुकीत मारला जातो त्याप्रमाणे हातावर शिक्का मारला जाईल. जेणेकरून हे लोक बाहेर दिसले तर बाहेरील लोकांना या लोकांना घरी कॉरंटाईन करण्यात आल्याचे समजेल. याबबातची सर्व माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.