कोरोना संकटामुळे यंदा बाप्पाला साधेपणाने निरोप
मुंबई – ऐतिहासिक व वैभवशाली परंपरा असलेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक यंदा प्रथमच खंडित झाली आहे. दरवर्षी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने पार पडलेल्या या उत्सवाचा निरोपही त्याच पद्धतीने करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी फिरत्या हौदांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीला मुंबई आणि पुण्यात डोळे दिपवणारा माहौल असतो. मात्र यावर्षी मुंबईचा राजा, लालबागचा राजासह इतर अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यंदाचं चित्र पूर्णत: वेगळं आहे. तर पुण्यातील गणेशोत्सवाची ख्यातीही देशभरात आहे, मात्र कोरोना संकटात इथेही साधेपणा विसर्जन सोहळा पार पडत आहे. मानाच्या गणपतीचं मंडपातच विसर्जन होत आहे.
दरम्यान, दरवर्षी बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन सोहळ्यात मिरवणूक सुरू होताच ढोल-ताशांच्या नादाने वातावरण बदलून जाते. भक्तीचा हा ज्वर पुढचे अनेक तास रस्त्यांवर अनुभवायला मिळतो. चौकाचौकात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मराठी नट-नेत्यांचा सहभाग, झांजेतून निघणारा स्वर आणि मोरया मोरयाच्या घोषणा, हे वातावरण अद्भुत असते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे हा अनुभव घेता येणार नाही.