कोरोना विरोधात लढण्यासाठी, फैलाव रोखण्यासाठी भारताकडे जालीम उपाय
कोरोना विषाणूबाधितांची संख्या देशात हळूहळू वाढू लागली आहे. रविवारपर्यंत १०७ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे उघड झाले. पण या आजाराविरोधात लढण्यासाठी आणि त्याचा फैलाव रोखण्यासाठी भारताकडे एकमेव जालीम उपाय असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. लोकांना कोणत्याही स्थितीत घरात थांबण्यासाठी निर्देश देणे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वाहतुकीवर आणि सार्वजनिक ठिकाणांवर कडक निर्बंध लादणे. ही ठिकाणी तात्पुरती बंद करणे. या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे केल्यास भारतात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होणार नाही, असे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत रविवारी मोठी वाढ झाली. हा आकडा देशात १०७ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणू बाधित ३३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे-पिंपरीमध्ये सर्वाधिक १६ रुग्ण आहेत.
कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्पेनमध्ये रविवारी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. लोकांनी कोणत्याही स्थितीत आपल्या घरातून बाहेर पडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. स्पेनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत १०० हून अधिक नागरिक मृत पावले असून, रविवारी २००० नव्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले.
फ्रान्समध्ये सर्व सार्वजनिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. इटलीमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेनेही कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.