कोरोना विरोधातली लढाई जिंकण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू
भारतात कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. आकडेवारीवरूनच हे सिद्ध करण्यात आले आहे. चाचण्या वाढवल्यानंतर देखील पॉझिटीव्हीटी दरात घसरण, सक्रिय रुग्णांच्या संख्येत सतत होत असलेली घट आणि रुग्ण बरे होण्याच्या दरात देखील सतत वाढ होत आहे. यावरून भारताची कोरोना विरोधातली लढाई जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
भारतात कोरोना संसर्गाच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतात ६२ लाखांहून अधिक करोनाचे रुग्ण ठीक झाले असून ही संख्या संपूर्ण जगात सर्वात जास्त आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढवल्यानंतरही पॉझिटीव्हीटीचा दर घटत आहे आणि हा चांगले संकेत असल्याचे ते म्हणाले. या व्यतिरिक्त सक्रिय रुग्णांची संख्या देखील ९ लाखांच्या खाली आहे. खरे तर, चाचण्या वाढवल्यानंतर देखील पॉझिटीव्हीटीच्या दरात घसरण होणे याचा अर्थ संसर्गाची गती आता काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे.
भारतात एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ८७ टक्के रुग्ण बरे झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ११.६९ टक्के झाली आहे, यांपैकी काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही घरी विलगीकरणात आहेत. तसेच, देशातील करोनाचा मृत्युदर १.५३ टक्के इतका आहे.