कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा टक्का वाढला -आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली | देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाव्हायरस थैमानात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचे ठीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, एकूण कोरोनापासून ठीक होणाऱ्या रुग्णांचा सरासरी दर सध्या 25.18 टक्के आहे आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी हा दर 13 टक्के होता. मात्र त्यात आता वाढ झाली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यास जो कालावधी सुरुवातीला 3.4 दिवसांवर होता. तो कालावधी आता 11 दिवसांवर गेला आहे. म्हणजेच भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्यात आता 11 दिवस लागत आहे. लॉकडाऊनमुळं कोरोनाचा वेग हा मंदावला असल्याचं लव अग्रवाल यांनी म्हंटल आहे. देभरात आतापर्यंत 33 हजारच्या वर नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 1 हजार पेक्षा जास्त रुग्णांना या आजारानं बळी घेतला आहे. तर आतापर्यंत 8 हजार 324 रुग्ण आजारातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.