कोरोनाची लक्षणे आढळल्याने दोन भारतीयांना परतण्यापासून चीननं रोखलं…
चीनमधल्या वुहान प्रांतातून ३२४ भारतीयांना विशेष विमानानं शनिवारी सकाळी भारतात आणलं गेलं. वुहान हे कोरोनाचं केंद्रबिंदू आहे. वुहान आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक अडकले होते त्यांना परत आणण्यासाठी भारतानं मोहीम राबवली आहे. ३२४ प्रवासी भारतात परतले मात्र त्यातल्या दोन भारतीयांना मायदेशी परतण्यापासून चिनी अधिकाऱ्यांनी रोखले आहे. त्यांना भारतात परतण्याची परवानगी नाकारली आहे. या दोघांमध्ये कोरोनाच्या अनेक लक्षणांपैकी एक महत्त्वाचं लक्षण आढळलं. या दोघांनाही ताप होता.
एका प्रवाशाचा ताप हा मर्यादेपलीकडे होता तर दुसऱ्या प्रवाशाला ताप येत जात होता. ताप येणे हे कोरोनाच्या अनेक लक्षणांपैकी एक आहे. त्यातून वुहानमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत त्यामुळे विशेष विमानानं भारतात परतण्यासाठी त्यांना चिनी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. यात एक महिला आणि एक पुरुष प्रवासी आहे.
भारतात परतण्याआधी सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याच आली तेव्हा या दोन भारतीयांमध्ये कोरोनाचं लक्षण आढळलं. पहिल्या मोहिमेत भारतीयांना परत आणल्यानंतर आता दुसऱ्या मोहिमेसाठी आता एअर इंडियाचं विशेष विमान चीनला रवाना झालं आहे.