कोकणातील अनेक भागात पावसाचा जोर कायम; 29 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज
संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस असून मुंबईत 24 ऑगस्टपर्यंत अपेक्षित पाऊस झाला आहे. पावसाचा हा जोर कोकणातील अनेक भागात मात्र कायम आहे. कोकण हा महाराष्ट्रातील असा एक भाग आहे जिथे पाऊस चांगलाच जोर पकडतो. सध्याही कोकणातील अनेक भागात पावसाचा हा जोर कायम असून येत्या 29 ऑगस्टला कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. हवामान खात्याचे उपमहासंंचालक के.एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
कोकणात यंदाही पावसाने चांगलाचा धुमाकूळ घातला असून अनेक नद्यांना पूर आला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात देखील समाधानकारक अशा पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 29 ऑगस्टला कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. तर मुंबई व उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवस म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत मुंबईत पावसाची चिन्हे दिसून येणार नाहीत असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
मुंंबई मध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुन झालेल्या तुफान पावसामुळे यंंदाचे पाणीकपातीचे संकट मात्र टळताना दिसत आहे. रविवार, 23 ऑगस्ट पर्यंत मुंंबईला पाणीपुरवठा करणार्या सातही तलाव व धरण क्षेत्रात 94% पाणी साठा जमा झाला होता, यानुसार लवकरच मुंंबईतील पाणी कपात रद्द केली जाउ शकते.