केरळ पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार एक महिन्यांचा पगार देणार
मुंबईः केरळमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात आजपर्यंत दोनशेच्यावर बळी गेले असून, हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झालेत. त्यामुळे केरळला सर्वच राज्यांकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारनेही तातडीची बैठक घेऊन 20 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी केरळमधल्या पूरग्रस्तांना मदत देण्याची घोषणा केली आहे. आता भाजप नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या 1 महिन्यांचा पगार केरळसाठी मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच इतरही आमदार-खासदारांना 1 महिन्याचा पगार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट्स, बेडशीट, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य पाठविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. तसेच केरळ पूरग्रस्तांच्या मदतकायार्साठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात करत आहेत. बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, राजशिष्टाचार आदी विभागही या मदत कार्यात गुंतलेले आहेत.
9 ऑगस्टनंतर 196 लोकांचा मृत्यू झाला तर, शनिवारी पुरात 22 लोक वाहून गेले. सध्या 6, 61,887 माणसांना 3466 रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. घरदार, शेती सारेच नष्ट झाल्याने अनेक जण मानसिकरीत्या पुरते खचले आहेत, तर काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे वा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात जखमींबरोबरच मानसिक आजारांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठी असून, त्यात केवळ वृद्धच नव्हे, तर तरुण व लहान मुलेही आहेत. शाळा, महाविद्यालये कित्येक दिवसांपासून बंद आहेत. रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.