पीक विमा योजनेमुळे विमा कंपन्या मालामाल : राहुल गांधी
औरद (कर्नाटक) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीक विमा योजनेत शेतकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे या योजनेमुळे खासगी विमा कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा फायदा घेत मालामाल होत आहे, असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यात राहुल गांधी यांनी मोदींचा रिपोर्ट कार्डच सादर केला.
राहुल गांधी म्हणाले, मोदींना कर्नाटक निवडणूकीत बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याने ते फक्त माझ्यावर वैयक्तिक टिका करत आहे. प्रत्येकवेळी माझी खिल्ली उडवित आहे. मी कधीही त्यांच्यावर वैयक्तिक टिका केली नाही. परंतु त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
दुसरीकडे स्वतः अमित शाह यांनी कर्नाटकची सरकार देशातील सर्वोत्कृष्ट सरकार असल्याचे सांगितले होते. तसेच कर्नाटक निवडणूकीच्या रणांगणात संपूर्ण “गब्बर सिंह’ची टीम भाजपने उतरविली असून आता रेड्डी ब्रदर्सही निवडणूक लढवित आहे, असे राहुल गांधी म्हणाले. कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे 8 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. पण यात केंद्राचे योगदान शून्य होते. पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. पण खासगी विमा कंपन्या नफा कमवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील पीक विमा योजनेवरुन आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दगा दिला असून पीक विमा योजना ही खासगी कंपन्यांसाठी कल्याणकारी योजना झाली आहे. शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून कंपन्या नफा कमवत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.