केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरीत निदर्शने
सर्व पक्षीय व सर्व कामगार संघटना कृती समितीचा सहभाग
पिंपरी | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या वतीने केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला पिंपरी चिंचवड मधून प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील विविध दुकाने बंद ठेवण्यात आली. तर केंद्र सरकारच्या विरोधात भाजप वगळता सर्व पक्ष संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सर्व पक्षीय व सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले.
या वेळी विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलन कर्त्यांनी आपल्या हातात पक्षाचे झेंडे घेतले होते. शेतकरी, कामगार एकजुटीचा विजय असो, केंद्र सरकार हाय, हायच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाला गालबोट लागू नये या साठी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. चौकात चारी बाजूला पोलिसांनी पहारा ठेवला होता. या बरोबरच वाहतुकीचे कर्मचारीही वाहतुकीचे चोख नियोजन पार पडताना दिसले.
पिंपरी चिंचवड शहरात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध दुकाने बंद ठेवण्यात आली. फेरीवाल्यानीही आपला व्ययसाय बंद ठेवला. शहरात रिक्षा बसेस सुरु होत्या. मात्र प्रवाशांची संख्या कमी होती. त्यामुळे शहरातील रस्ते काही ठिकाणी शांतच असल्याचे पहावयास मिळाले. वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावरील वाहने हटविण्याच्या सूचना देत होते. त्यामुळे एरव्ही रस्त्यावर दिसणारी वर्दळही कमी झाल्याचे चित्र होते.
आंदोलकांच्या मागण्या –
१) शेतकरी विरोधी नवे तीन कायदे मागे घ्या. प्रस्तावित वीज बिल रद्द करा.
२) सर्व शेतमालाची सरकारी खरेदी, व स्वामिनाथन समितीच्या शिफारशीनुसार आधारभूत किंमत कायदा करा.
३) महाराष्ट्र सरकारने अधिवेशनात कृषी कायद्यांच्या विरोधात छत्तीसगड सरकारच्या बाजार समिती कायद्याच्या आधारावर महाराष्ट्रात कृषी कायदा सुधारावा. यामुळे सरकारला अधिक महसूल होईल.
४) कृषी उत्पन्न बाजार समित्या अक्षम व शेतकरी भिमुख करा. खरेदी व वितरण यांची सांगड घालून शेतकऱ्यांना अभय द्या. शेतकरी ग्राहक अंतर कमी करा.