कृषि विधेयकावरून राज्यसभेत काँग्रेससह विरोधक आक्रमक
नवी दिल्ली – लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर मोदी सरकारने कृषिविषयक तीन विधेयकांपैकी दोन विधेयक आज राज्यसभेत मांडली. या विधेयकांवरून राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. विधेयके सादर होताच काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘शेतकऱ्यांना प्रस्तावित कायदे त्यांच्या आत्म्यावर हल्ला केल्यासारखी वाटत आहेत, त्यामुळे आम्ही या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करणार नाही’, अशी भूमिका घेत विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, कृषिविषयक विधेयकांमुळे शेतकऱ्यांना मिळणारी न्यूनतम समर्थन मूल्य आणि उत्पादनांची सरकारी खरेदीची प्रणाली संपुष्टात येईल. यामुळे सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांनाच सहन करावं लागणार आहे आणि देशातील मोठे भांडवलदार आणखी मालामाल होतील, असं ट्विट करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीही कृषि विधेयकांना विरोध दर्शवला आहे.