breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘काय, साहेब? लोक मूर्ख वाटले का?’; औरंगाबाद नामांतरणावरुन बॉलिवूड गायकाचा भाजपाला टोला

मुंबई | महाईन्यूज

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं ही मागणी जोर धरु लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरुन विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. मनसेपाठोपाठभाजपानेही सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर नाव करावं ही मागणी केली आहे.

अलीकडेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे अशी भूमिका मांडली. त्यावरुन बॉलिवूड गायक आणि संगीतकार विशाल दादलानीने भाजपाला टोला लगावला आहे. याबाबत विशाल दादलानीने ट्विट करुन म्हटलंय की, गेली ५ वर्ष सत्तेत असताना औरंगाबादचं नामकरण झालं नाही. पण काही महिन्यांपूर्वी सत्तेतून पायउतार झाल्यावर सर्कस सुरु झाली आहे. काय साहेब, लोक मूर्ख वाटले का? अशा शब्दात भाजपावर निशाणा साधलेला आहे.

मागील आठवड्यात राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले होते की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं सांगत शिवसेनेला टोला लगावला होता. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यावरुन भाजपा-मनसे शिवसेनेला कोंडीत पकडणार हे नक्की आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button