कामात हलगर्जीपणा केल्याने वेलमेड कंपनीचे 36 कामगार बडतर्फ
- युनियन केल्याने कारवाई केल्याचा कामगारांचा आरोप
- कामगारांनी मांडले मंत्री बच्चू कडू यांच्याकडे गा-हाणे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
भोसरीतील वेलमेड सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाने 36 कामगारांना बडतर्फ केले. आता कंपनीच्या विरोधात कायदेशीर लढा सुरू असतानाच कामगारांनी बुधवारी (दि. 4) कामगार राज्य मंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे गा-हाणे मांडले आहे. त्यावर दोनच दिवसांत कंपनी व्यवस्थापनाशी समन्वय साधून तोडगा काढण्याचा विश्वास मंत्री बच्चू कडू यांनी कामगारांना दिला.
युनियनची स्थापना केल्यामुळे भोसरी येथील वेलमेड लॉकिंग सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 36 कामगारांना आज बडतर्फ केले. त्यांना त्याबाबत नुकतेच पत्र देण्यात आले आहे. त्यावर आमच्यावर कंपनी व्यवस्थापनाने अन्याय केला असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली आहे. तर, कामात हलगर्जीपणा करणे, कामावर न येणे, पत्र देऊनही दुर्लक्ष करणे या कारणांमुळे कायदेशीर कारवाई केली असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.
भोसरी एस ब्लॉकमधील वेलमेड लॉकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधील कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये सुरूवातीला सुमारे 100 कायम कामगारांनी सहभाग नोंदविला होता. 29 मे 2019 पासून कामगार विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत. कामगारांना न्याय मिळावा म्हणून कामगांरानी तत्कालीन व विद्यमान कामगार मंत्र्यांकडेही आपल्या मागण्यांचे गार्हाणे मांडले. मात्र, त्याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. दरम्यानच्या काळात कामगार उपायुक्तांनी बोलावलेल्या बैठकीकडेही कंपनी व्यवस्थापनाने पाठ फिरविल्याने हा प्रश्न अधांतरीच राहिला. आता कामगार मंत्री बच्चू कडू यांच्याकडे धाव घेतली. बुधवारी (दि. 4) मंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली असता त्यावर कंपनी व्यवस्थापनाशी समन्वय साधून तोडगा काढण्याचा विश्वास मंत्री कडू यांनी दिला आहे.
कंपनी व्यवस्थापनाची कायदेशीर कारवाई
न्यायालयात याचिका सुरू असल्याने कामगार उपायुक्तांच्या बैठकीला गेलो नसल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांचे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मात्र, कामगारांनी बेमुदत संप बंद करून कामावर यावे, याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून पत्रव्यवहार करण्यात आले. कामगारांना तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. कामावर येण्यासाठी सात महिने वाट पाहिली. तरी देखील कामगारांनी कामाकडे पाठच फिरवल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली. संबंधीत कामगारांवर चौकशी समितीद्वारे कायदेशीर कारवाई केली असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली.
कंपनी व्यवस्थापनाकडून 36 कामगारांना बडतर्फ केले आहे. कामगारांना तसे पत्रही दिले आहे. पुढे आम्ही न्यायालयाद्वारे लढा चालूच ठेवणार आहे. तसेच संबंधीत मंत्र्यांना भेटून आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवणार आहे.
विनोद जाधव, सरचिटणीस, वेलमेड लॉकिंग एम्प्लॉईज युनियन